चेतनेचा विस्तार म्हणजे शांती (Know conciousness in Marathi)

चेतनेचे शरीराच्या पृष्ठभागावर वावरणे म्हणजे उत्तेजना. त्याने सुख प्राप्त होते. जेव्हा चेतना आकुंचन पावते, तेव्हा वेदना आणि व्यथा यांचा अनुभव होतो. व्यथा म्हणजे चेतनेचे आकसणे किंवा आकुंचन पावणे होय.

जेव्हा चेतना मर्यादित मार्गातून शरीरात वाहते तेव्हा सुखाची अनुभूती होते. पुनःपुन्हा सुखद संवेदनेचा उपभोग घेतल्याने सुस्ती आणि निरसता येते. बहुदा आचाऱ्यांना स्वतः शिजवलेले अन्न आवडत नाही. एकच संगीत सतत ऐकल्यामुळे त्याच्यातील जादू हरवते. कामुक उद्योगात असणाऱ्या लोकांना समागम करण्यात मजा येत नाही. जर शरीरात होणा-या उत्तेजनेचं निरीक्षण केले तर चेतनेचा विस्तार होऊन ती शांत होते. उत्तेजक संवेदनांबाबत सजग राहिल्याने त्यांचे महत्व हरवून जाते. त्या असण्या किंवा नसण्याने काहीही फरक पडत नाही. जसे आकाशात सूर्य असताना मेणबत्ती पेटवलेली आहे किंवा नाही त्याने काहीही फरक पडत नाही. सर्वप्रकारची सुखे ही केवळ उत्तेजक संवेदना आहेत आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे आहात हे लक्षात आल्यावर मुक्ती प्राप्त होते.

वेदना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या चेतनेची विस्तारित होऊन मुक्त होण्याची धडपड होय. मुळात मुक्ती म्हणजे  उत्तेजक संवेदनांची जी चटक असते त्यापासून सुटका. वेदना कायम राहू शकत नाही. चेतनची नैसर्गिक प्रवृत्ती आहे विस्तारित होण्याची, परमानंद होण्याची. जशी पाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती खालच्या दिशेने वाहण्याची आहे आणि हवेची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कोणत्याही दबावाखाली नसण्याची. त्याचप्रमाणे चेतनेची नैसर्गिक प्रवृत्ती आहे विस्तारण्याची आणि शांत होण्याची. ज्याप्रमाणे निद्रानाशाचा त्रास असणारी एक व्यक्ती आहे आणि ती झोपायचे कसे हे पूर्णपणे विसरलेली आहे त्याप्रमाणेच आपल्यापैकी जवळजवळ सर्वजणच शांत कसे असावे आणि परमानंद कसा अनुभवावा हे विसरलेले आहोत.

प्रश्न: सत्संगामधून मिळणाऱ्या संतोषाचे काय?

उत्तर: सत्संगाचा संतोष तुम्हाला विस्ताराकडे घेऊन जातो.